Friday, 14 April 2017

मुमताजचा जन्मदिवस आणि ताजमहालवरची दोन गाणी



अक्षरनामा, गाता रहे मेरा दिल, शनिवार, 15 एप्रिल 2017

एकच वर्ष आहे (1964). मोहम्मद रफी हा एकच गायक आहे. ताजमहाल हा एकच विषय आहे. पण गाणी दोन टोकाची आहेत. पहिलं गाणं नौशादचं आहे ‘लीडर’ या दिलीपकुमार वैजयंतीमाला यांच्या गाजलेल्या चित्रपटात शकिलनं लिहीलेलं. चित्रपट रंगीत आहेत. ताजमहालचं त्या काळाच्या मानानं अप्रतिम असं चित्रण केलं आहे. नुसता ताजच नव्हे तर भोवतालची बाग, कारंजं हे सगळंच यात येतं. शकिलचे शब्द तसे पारंपरिक म्हणजे ताज कसं प्रेमाचं प्रतिक आहे, इथे प्रेमाला अप्रतिम रंग कसा चढला आहे, गरीब असो की श्रीमंत सगळ्यांसाठीच ही जागा म्हणजे प्रेमाचं प्रतिक आहे वगैरे वगैरे. 

लता आणि रफीने आपल्या मधुर आवाजात या गीताचं सोनं केलं आहे हे वेगळं सांगायची गरजच नाही. ललत रागातील चाल या गाण्याला नौशाद यांनी बांधलेली आहे. त्या काळात ज्या पद्धतीची गाणी असायची त्याच पठडीत हे गाणं आहे. 

इक शहेनशाह ने बनवाके हसी ताजमहल
सारी दुनिया को मुहोब्बत की निशानी दी है
इसके साये मे सदा प्यार के चर्चे होगे
खत्म जो हो न सकेगी वो कहानी दी है

हे शब्दही तसे साधेच पण लक्षात राहणारे आहेत. सोपेपणा हा शकिलच्या शायरीचा एक गुणधर्मच राहिला आहे.  नौशाद यांच्या चालीतही सोपेपणा आहे. शास्त्रीय संगीतावर आधारीत चाली हे तर त्यांचे वैशिष्ट्यच. 

देवदास (1954, सं-एस.डी.बर्मन), नया दौर (1957 सं-ओ.पी.नय्यर), मधुमती (1958 सं-सलिल चौधरी), पैगाम (1959 सं-सी.रामचंद्र), गंगा जमुना (1961 सं-नौशाद), लीडर (1964 सं-नौशाद) आणि संघर्ष (1968 सं-नौशाद) असे सात चित्रपट दिलीपकुमार आणि वैजयंतीमाला यांनी दिले. या सगळ्यांतील गाणी गाजली. वेगवेगळे संगीतकार असले तरी दिलीपकुमार यांच्या चित्रपटांतील गाणी नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहेत. देवआनंद-राज कपुर-गुरूदत्त यांच्यासारखाच काहीतरी संगीताचा कान दिलीपकुमार यांना निश्‍चितच असणार. नसता संगीतकार बदलूनही त्यांच्या चित्रपटात गाणी दर्जेदार राहिली यामागे दुसरे काय कारण.  पण नौशादच्या संगीतातले दिलीपकुमारचे चित्रपटत सांगितीक दृष्ट्या जास्त गाजले हे खरं आहे. 

‘लीडर’ मध्येही इतर गाणी सुंदरच आहेत. तीन कडव्याचं ‘इक शहेनशाह ने बनवाके हसी ताजमहल’ हे मोठंच गाणं आहे. या गाण्याची रचना शकिलने सामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवूनच केली आहे. फक्त धृ्रवपद म्हणून ‘शहेनशाह ने बनवाके’ असे शब्द वापरले आहे.
याच वर्षी ‘गझल’ चित्रपटात साहिरची ताजमहाल वरची कविता मदनमोहनने गाणं म्हणून घेतली आहे. त्याचाही गायक रफीच आहे. सुनील दत्त व मीनाकुमारी यांचा हा कृष्ण धवल चित्रपट. काय योगायोग आहे, साहिरला शकिलच्या कवितेवर टीका करायची होती किंबहुना त्याच्या विरोधी भावना व्यक्त करायची होती. आणि त्या रंगीत गाण्याला उत्तर म्हणून हे गाणंच कृष्ण धवल असावं म्हणजे काय. 

मूळ साहिरची ही कविता मोठी आहे. यातील दोनच कडवे मदनमोहनने गीत म्हणून वापरले आहेत.

अनगिनत लोगों ने दुनिया मे मोहब्बत की है,
कौन कहता है कि सादिक न थे जज्बे उनके?
लेकिन उनके लिए तशहीर का सामान नही,
क्योंकि वे लोग भी अपनी ही तरह मुफलिस थे ।

ताजच्या सौंदर्याचे वर्णन करणं शकिलने टाळले होते. खरं तर शकिल पूर्णपणे चित्रपटासाठी एखादं गाणं लिहावं असं लिहून गेला आहे. त्या पातळीवर ते पूर्णत: बरोबरच आहे. त्याला आपल्या पद्धतीनं गायक, कलाकार, संगीतकार सगळ्यांनीच न्याय दिला आहे.

पण साहिरचे तसं नाही. ही कविता म्हणूनच लिहीली गेली आहे. चित्रपटात येताना ते गाणं जबरदस्ती आलं असंच वाटत राहतं. शिवाय ही चालही लक्षात रहात नाही. गाण्यात नसलेली पण कवितेतील एका कडव्यात साहिर लिहीतो

मेरे मेहबुब! उन्हे भी तो मुहोब्बत होगी
जिनकी सन्नाई ने बक्षी है इसे शक्ले-जमीन ।
उनके प्यारों के मकाबिर रहे बे-नामो-नमूद 
आज तक उनपे  जलाई न किसीने कंदील ।

ही जी डावी विचारसरणी साहिर कलेच्या प्रांतातही मांडू पाहतो हीला तेंव्हा प्रचंड प्रतिसाद मिळाला. एखाद्या कारखान्यात काम करणार्‍या कामगारांसाठी मालकाविरूद्ध लढावं तसा साहिर ताजमहाल साठी काम करणार्‍या छोट्या छोट्या कारागिरांसाठी लढतो आहे. त्यांची बाजू मांडतो आहे असंच वाटतं. पण प्रत्यक्षात या कामासाठी प्रचंड रक्कम खर्च झाल्याचे कागदोपत्री पुरावे आहेत. कामगारांना बिनावेतन राबवून घेतलं असं नाहीऐ. पण साहिरला कोण सांगणार.
गाण्यात जे कडवं शेवटी आलं आहे त्यात साहिर लिहीतो

ये चमनजार, ये जमना का किनारा ये महल
ये मुनोक्कश दरो-दिवार ये मेहराब ये ताक
इक शहनशाह ने दौलत का सहारा लेकर,
हम गरिबों की मोहब्बत का उडाया है मजाक ।
मेरे मेहबूब ! कही और मिला कर मुझसे !

शोषण करणारा आणि शोषित अशी मांडणी मार्क्सने केली. त्याभोवती जगभरचे विचारवंत फिरत राहिले. पण लिखाणातही आणि विशेषत: प्रेमासारख्या विषयातही मार्क्स आणण्याचं काम हिंदी गाण्यात साहिरनं केलं. 

आज ही दोन्ही गाणी ऐकत असताना ‘लीडर’मधील गाणंच उजवं वाटतं. साहिरची कविता श्रेष्ठच आहे. तुलनाच करायची तर शकिल पेक्षा साहिर जास्तच प्रतिभावंत होता यात काही वादच नाही. पण गाणं म्हणून मनात रेंगाळतं ते शकिलचंच. कदाचित गाण्यासाठी शब्दांची जी तडजोड करावी लागते ती साहिरने केली नसावी. साहिरच्या कवितेतील शब्द गाण्यात मावत नाहीत, त्यांचे अर्थ चटकन उलगडत नाहीत. 

किंवा असंही म्हणता येईल की मदनमोहन हा आशय पोचविण्यासाठी असमर्थ ठरला. कारण प्यासा मध्ये ‘ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है’ चा साहिर लिखित आशय एस.डी.बर्मनने फार परिणामकारक रित्या संगीतातून पोंचवला होता. इतकंच काय साधना चित्रपटात एन.दत्ताने ‘औरत ने जनम दिया मर्दो को, मर्दो ने उसे बाजार दिया’ ही साहिरची कविताही तिच्या दाहकतेसह पोचवली होती. त्या आशयाला उचीत न्याय दिला होता. 

पण इथे मात्र काहीतरी कमी पडलं आहे. साहिरचा आशय नीट पोचतच नाही.

जिच्यासाठी हा ताजमहाल बांधला त्या मुमताज महल हीचा 17 एप्रिल हा जन्मदिवस. म्हणून ही एक आठवण.    
   
          -आफताब परभनवी.

No comments:

Post a Comment