अक्षरनामा, गाता रहे मेरा दिल, शनिवार, 29 एप्रिल 2017
शंकर-जयकिशन सोबतच अजून एका संगीतकाराला शैलेंद्रच्या निसर्ग व प्रेम या भावनांना शब्दबद्ध करून लताच्या आवाजात सादर करण्याचा मोह पडला. आणि ती गाणीही अविस्मरणीय ठरली. त्या संगीतकाराचे नाव सलिल चौधरी.
सलिल चौधरी आणि शैलेंद्र यांचा पहिला चित्रपट म्हणजे ‘दो बिघा जमिन’ (1953). यात निसर्गाचे अतिशय सुंदर गाणे आहे ‘धरती कहे पुकार के’. पण हे केवळ लताचे गाणे नाही. मन्नादाच्या आवाजाची अप्रतिम साथ लताला लाभली आहे. किंबहूना हे गाणे मुख्यत: मन्नादाचेच आहे. लताचे सूर त्याला साथ देतात. याच चित्रपटातील दुसरे सुंदर गाणे ‘हरियाला सावन ढोल बजाता आया’ असेच मन्नादा आणि लता या दोघांचे आहे. खरं तर ही दोन गाणी म्हणजे पावसा आधीची धरतीची आस आणि पाऊस आल्यावरचा तिला झालेला आनंद. धरती आभाळाच्या मिलनातून सृष्टीचे पुढे पुढे चाललेले चक्र. स्त्री-पुरूष प्रेमाचे हे एक प्रतिकच सलिल चौधरी दाखवू इच्छितात. पण हे गाणे आपल्या विषयाच्या चौकटीत बसत नाही.
या त्रिकुटाचे प्रेमाचे पहिले आनंदी गाणे अतिशय गाजलेल्या ‘मधुमती’ (1958) मधले आहे. ‘जूल्मी संग आख लडी रे’. शंकर जयकिशनच्याही एक पाऊल पुढे सलिल चौधरी निघून जातात. कारण त्यांनी गीतातल्या भावनेला न्याय देण्यासाठी अतिशय काळजीपूर्वक वाद्यांचा वापर केला आहे. शंकर जयकिशन चाल सुंदर बांधतात पण भरपूर वाद्य वापरण्याचा मोह त्यांना टाळता येत नाही.
निसर्गात प्रेम भावना व्यक्त करताना बासरी सारख्या वाद्याचा उल्लेख आणि त्या अनुषंगाने राधा-कृष्णाच्या प्रेमाचे सुचन करत शैलेंद्र गीताला वेगळाच गोडवा प्राप्त करून देतो.
वो छुप छुप के बंसूरी बजाये रे
सुनाये मुझे मस्ती मे भरा हुआ राग रे
मोहे तारों की छाव मे बुलाये
चुराये मेरी निंदीया मै रह जाऊ जाग रे
लगे दिन छोटा रात बडी
जूल्मी संग आंख लडी रे
आता असे शब्द असल्यावर लताच्या सूरात जास्तीचा गोडवा येणार नाही तर काय! या गाण्यात अजून दोघांचे योगदान मोठे आहे. एक म्हणजे दिग्दर्शक बिमल रॉय आणि दुसरी म्हणजे नायिका वैजयंतीमाला. ज्या पद्धतीनं वैजयंती मालानं या गाण्यावर नृत्य केलंय ते वहिदा रहेमान सोडल्यास इतर कुणाला जमेल की नाही शंका येते.
याच चित्रपटातील दुसरं गाणं ‘घडी घडी मोरा दिल धडके’. इथे नायिका निसर्गात मुक्तपणे फिरत आहे.
‘आज पपिहे तू चूप रहना, मै भी हू चुपचाप,
दिल की बात समझ लेंगे, सावरीया अपने आप’
आपल्या सोबत पक्षालाही गृहीत धरण्याची ही कल्पना सुंदर आहे.
‘परख’ (1960) हा बिमल रॉय यांचा महत्त्वाचा सिनेमा. ‘मधुमती’ सारखेच सलिल-लता-शैलेंद्र हे त्रिकुटही इथे आहे. खरं तर ‘दो बिघा जमीन’, ‘मधुमती’, ‘परख’, ‘उसने कहा था’ या चार चित्रपटांना बिमल रॉय-सलिल-लता-शैलेंद्र असा सांगितिक समभूज चौकोनच म्हटलं पाहिजे. या गाण्यांचे चित्रिकरण वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे.
‘परख’ मध्ये साधनाच्या तोंडी ‘ओ सजना बरखा बहार आयी’ हे नितांत सुंदर गाणे आहे. या गाण्याचं चित्रण, गाण्याच्या सुरवातीपासून लताच्या स्वरांशी जूगलबंदी करत आलेली सतार, साधना कट नसलेली साधी गोड साधना या सगळ्याचं एक वेगळंच रसायन पडद्यावर जमून आलं आहे. हे गाणं नुसतं ऐकायला तर गोड आहेच पण पहायलाही देखणं आहे. शैलेंद्रने फार कमी शब्दांत ही भावना मांडली आहे.
तूमको पुकारे मेरे मन का पपिहा
मिठे मिठे अगनी जले मोरा मनवा
ऐसी रिमझिम मे ओ साजन
प्यासे प्यासे मेरे नयन
तेरे ही ख्वाब मे खो गये
सावली सलोनी घटा जब जब छायी
आखियो मे रैना गई निंदीया ना आयी
इतकंच हे गाणं आहे.
दुसरं एक गाणं याच चित्रपटात आहे. मोकळी हवा, निसर्ग, झरे, नद्या, डोंगर, आभाळ, धरती, हिरवळ, वारा, ढगाळलेलं आभाळ या सगळ्यांची नेहमीसाठीच एक ओढ शैलेंद्रला जाणवते. सलिल चौधरी सारखा संगीतकार आणि बिमल रॉय सारखा दिग्दर्शक लाभल्यावर मग तर काही विचारायलाच नको. साधना झाडाजवळ बसली आहे. तिला एक कानातल्या झुमक्यासारखं फुल दिसतं. आणि पाठोपाठ म्हशीच्या पाठीवर बसून जाणार्या गुराखी मुलाचा पावा ऐकायला येतो. हा तुकडा फारच सुंदर आहे. सुरांचे असे बारकावे शंकर जयकिशन फारसे टिपत नाही. साधना त्या सुरावटीप्रमाणे गुणगुणते. परत पावा ऐकू येतो. आणि हे सुंदर गाणंच सुरू होतं
मिला है किसी का झुमका, ठंडे ठंडे हरे हरे नीम तले
ओ सच्चे मोतीवाला झुमका, ठंडे ठंड हरे हरे नीम तले
सुनो क्या कहता है झुमका
प्यार का हिंडोला यहां झूल गये नैना
सपने जो देखे मुझे भूल गये नैना
हाय रे बेचारा झुमका, ठंडे ठंडे हरे हरे नीम तले
या गाण्यात गुराखी म्हशीच्या पाठीवर बसून पावा वाजवत आहे. शेळ्या धुळ उडवत निघाल्या आहेत. वासरं हुंदडत आहेत. तळ्याच्या पाण्यात कमळं डोलत आहेत. सगळं आऊट डोर शुटिंग. कुठेच सेट लावलेला नाही. कृत्रिमता कुठेच नाही. साधनाला तर जवळपास मेकअप नाहीच. गळ्यात एक साधी साखळी. हातात दोन दोन बांगड्या. गडद काठाची कलकत्ता हँडलूमची साडी. लांब हताचे गळ्यापर्यंत ब्लाऊज.
बिमल रॉय-सलिल-लता-शैलेंद्र या सांगितिक समभूज चौकोनाचं पुढचं गाणं ‘उसने कहा था’ (1961) मधलं आहे. ‘उसने कहा था’ हा बिमल रॉय यांचे दिग्दर्शन नसलेला पण निर्मिती असलेला चित्रपट. इथे साधनाच्या जागी नंदा आहे. कमळं फुललेल्या तळ्याच्या काठी दोन्ही हातावर ओढणी आभाळासारखी पसरून ती म्हणते आहे
‘मचलती आरजू खडी बाहे पुकारे
ओ मेरे साजना रे धडकता दिल पुकारे आ जा
मेरा आंचल पकड के कह रहा है मेरा दिल,
जमाने की निगाहो से यहां छूप छूप के मिल,
यही तनहाईयो मे दिल की कली जायेगी खिल’
आता हीच भावना आधीच्याही गाण्यांमध्ये आली आहे. शैलेंद्रच्या डोक्यात निसर्ग आणि प्रेम हे समिकरण काहीतरी पक्कं बसलं आहे. या गाण्यात वडाचे पिंपळाचे झाड दाखवले आहे. त्यालाही परत पुराणकथांचे संदर्भ आहेत. वडाशी तर सत्यवान सावित्रीची कथा चिकटलेलीच आहे. याच चित्रपटात तलत-लताचे अविट गोडीचे ‘आ हा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिये, आयी रात सुहानी देखो प्रीत लिये’ गाणे आहे.
नंदाच्या वार्यावर उडणार्या ओढणीसोबतच वार्याच्या झुळूकीने गवतावर उठलल्या लाटाही जेंव्हा बिमल रॉय दाखवतात तेंव्हा खरंच शब्द, सुर, कॅमेरा सगळं सगळं कसं एकजिनसी होऊन एक काव्यच आपल्या डोळ्या समोर जिवंत करतात, आणि कानांसोबतच डोळ्यांनाही त्याचा सुखद अनुभव देऊन जातात.
बिमल रॉय शिवाय या त्रिकुटाने अजून दोन चित्रपटांत दखल घ्यावी अशी याच आशयाची गाणी दिली आहेत. ‘चार दिवारी’ (1961) मध्ये नंदाच्याच तोंडी हे गोड गाणे आहे,
‘झुक झुक झुक झूम घटा छायी रे,
मन मोरा लहराये,
पीहू पीहू पीहू पपिहा गाये रे’.
दोरीवर वाळलेले कपडे काढताना, अंथरूण पांघरूण आवरताना हे गाणं आहे. गाण्यातल्या सगळ्या प्रतिमा परत निसर्गाच्याच आहेत. बाज उभी करून ठेवताना बाजेच्या ताणलेल्या दोर्यांआडून तिचा चेहरा दाखवताना केवढी कल्पकता दिग्दर्शक दाखवतो. घरातली साधी साधी कामं करतानाही कॅमेराने सौंदर्य टिपलं आहे.
याच वर्षीच्या तनुजाच्या ‘मेमदिदि’ (1961) चित्रपटातही या त्रिकुटाने एक दोन नाही तर तब्बल तीन अशी गाणी दिली आहेत. पहिलं गाणं आहे
‘रातों को जब नींद उड जाये,
घडी घडी याद कोई आये’
यात कोरसचा अतिशय चांगला वापर केला आहे. हिंदी गाण्यात कोरसचा वापर जसा सलिल चौधरी यांनी केला तसा फार कमी संगीतकारांनी केला.
दुसरं गाणं
‘भूला दो जिंदगी के गम, तराना छेडो प्यार का,
के आ रहा है आ रहा है कारवा बहार का’
ज्यात परत अतिशय चांगला कोरसचा आणि पाश्चिमात्य सुरावटीचा वापर केला आहे. निसर्ग तर आहेच जो की अशा गाण्यात शैलेंद्रच्या शब्दांचा अविभाज्य भागच आहे.
‘कली कली से कह दो हमसे मुस्कूराना सीख ले,
कहां है भवरा आके हमसे गुनगुनाना सिख ले,
ये दिन है सारी जिंदगी मे सिर्फ एक बार का’
शैलेंद्रला शब्द सहज सुचत जातात. किंवा खरं तर एखादी चाल संगीतकाराने दिली की त्याच्या डोक्यात असे शब्द फेर धरून नाचायला लागतात की काय अशी शंका येते.
तिसरं गाणं खुपच गोड आहे. तरूणपण आलं म्हणजे बालपण सोडून गेलं. आणि त्याच्या जाण्याची लाडीक तक्रार आहे
.‘बचपन ओ बचपन, प्यारे प्यारे बचपन,
ओ लल्ला सच बतला, कहां गया तू छोड के’
या शब्दांना साजेशी अशी गतिमान चाल गाण्याला आहे. खरं तर हे गाणं गीता किंवा अशासाठी असावं असं वाटतं. पण लताच्या आवाजाची कमाल म्हणजे तिनं याला योग्य तो न्याय दिला आहे. तिच्या आवाजाताला अवखळपणा इथे जाणवतो.
या काही गाण्यांतून सलिल-लता-शैलेंद्र हा सांगितिक त्रिकोण समभूज आहे हे लक्षात येते. इथे शब्द-सुर-संगीत सारख्याच ताकदीनं येतात. बिमल रॉयच्या चित्रपटात तर हा त्रिकोण समभूज चौकोन बनतो. असं फार कमी वेळा घडलेलं आहे.
शंकर जयकिशनसोबत शैलेंद्रने सगळ्यात जास्त गाणी दिली. पण त्यासोबतच शैलेंद्रच्या शब्दांची जातकुळी ओळखून त्याला न्याय देणारे सलिल चौधरी सारखे संगीतकारही होते.
-आफताब परभनवी.