Sunday 10 December 2017

प्रेमगीतांतून कलेकलेने उमलत गेलेला ‘शशी’


अक्षरनामा, 9 डिसेंबर 2017

त्याचं वय झालं होतं. तो आजारी होता. तो जाणारच होता. पण गेला तेंव्हा ‘मॅटनी’ शो ची दूपार उदास करून गेला. मुुंबईला या काळात कधी पाऊस पडत नाही. पण त्या दिवशी सर्वत्रच उदास ढग दाटून आले होते. पाऊसही कोसळलायला लागला होता.  रवीच लोपला तेंव्हा शशी दिसायचे काही कारणच नव्हते. शशी कपुर वयाच्या 79 व्या वर्षी पंचत्वात विलीन झाला.

त्याचा पहिला चित्रपट होता ‘धर्मपुत्र’ (1961). एन.दत्ताच्या संगीतात साहिरचे शब्द शशी कपुरच्या तोंडी होते. तेंव्हा दुय्यम समजल्या गेलेल्या महेंद्र कपुरचा आवाज त्याच्यासाठी वापरला गेला. इंद्राणी मुखर्जी त्याची नायिका होती. साहिरचे शब्द अप्रतिम होते पण ना देखणी कुणी नायिका समोर होती ना रफीसारखा मधाळ आवाज होता.

भूल सकता है भला कौन ये प्यारी आंखे
रंग मे डूबी हुयी निंद से भारी आंखे

हे गाणं रसिक खरेच विसरून गेले. पुढे हीच चाल जरा घासून पुसून रवीने साहिरच्याच शब्दांत ‘गुमराह’ मध्ये वापरली तेंव्हा ती रसिकांच्या लक्षात आली. (आप आये तो खयाले दिले नाशाद आया-महेंद्र कपुर)

पुढे ‘चार दिवारी’ (1961) लगेच आला. याला सलिल चौधरीचे सुंदर संगीत होते. शैलेंद्रचे शब्दही चांगलेच होते. पण यात शशी कपुरसाठी गाणेच नव्हते. पुढे लोकप्रिय ठरलेल्या शशी-नंदा या जोडीचा हा पहिलाच चित्रपट. नंतर याच जोडीचा दुसरा चित्रपट आला ‘मेहंदी लगे मेरे हाथ ’ (1962). याला संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचे. यात मुकेशचा आवाज शशी साठी वापरला गेला होता. पण यातली गाणी विशेष नव्हती. आनंद बक्षी ने गीतकार म्हणून जो कारखाना पुढे सुरू केला त्याची सुरवात इथून होते. ‘उडे पंछी टोली मे, तुझे मै ले जाऊंगा बिठलाके डोली मे’ असली शब्द रचना असल्यावर पुढे काय होणार?

शशी कपुरच्या वाट्याला आलेल्या पुढच्या चित्रपटातील अतिशय गोड गाण्यांनी रसिकांना रिझवले. हा चित्रपट होता सलिल चौधरीच्या संगीतातला ‘प्रेमपत्र’ (1962). साधना कट नसलेली गोड साधना यात शशीची नायिका होती. अंध असलेल्या शशीच्या तोंडी तलत च्या मखमली स्वरातील गाणं आहे

ये मेरे अंधेरे उजाले न होते
अगर तूम न आते मेरे जिंदगी मे

या ओळींना लताच्या गोड आवाजात साधना उत्तर देते

न जाने मेरा दिल ये क्यूं केह रहा है
तूम्हे खो न बैठू कही रोशनी मे

राजेंद्रकृष्ण यांची अतिशय सहज अशी शब्दरचना गाण्याला गोडवा प्राप्त करून देते. आधीचा संगीताचा अंधार मिटवून शशी च्या चित्रपट आयुष्यात मधुर संगीताचा उजेड इथून पडायला सुरवात होते.

यातील दुसरं गाणं मुकेश-लताच्या स्वरात आहे. इंद्राणी मुखर्जीला न शोभणारे शब्द इथे साधनासाठी मात्र अतिशय चपखल बसतात. मुकेशचा आवाज अतिशय थोड्या संगीतकारांना प्रेमगीतात चपखलपणे वापरता आलेला आहे. त्यात सलिल चौधरीचा क्रमांक वरचा लागतो. हे गाणं आहे

दो आखियां झुकी झुकी सी
कलियों से नाजूक होठों पे
कविता रूकी रूकी सी

आंघोळ करून आलेला बनियन घातलेला टॉवेल खांद्यावर असलेला मध्यमवर्गीय नोकरदार शोभणारा शशी आणि गाऊन घातलेली, न्हाऊन केस मोकळे सोडलेली साधना. शशी कपुरची घरगुती साधा माणूस हीच प्रतिमा पुढे घट्ट झाली. नंदा सेाबत त्याची जोडी जमली ती याच कारणाने. साधना-शर्मिला-राजश्री-बबिता-हेमा-राखी यांच्यापेक्षा नंदाचा साधेपणाच त्याच्यासोबत जास्त उठून दिसायचा.

‘जबसे तूम्हे देखा है’ (1963) मध्ये शम्मी सोबत ‘तूम्हे हुस्न दे के’ या कव्वालीत शशी कपुर होता. शशी साठी रफीचा आवाज पहिल्यांदाच वापरला गेला. या कव्वालीत रफी-मन्ना-आशा सोबत लताचाही आवाज आहे. कव्वाली-मुजर्‍यांसाठी फारच कमी वेळा लताचा आवाज वापरला गेला.

याच वर्षी हैदराबादचा संगीतकार इक्बाल कुरैशीचा ‘ये दिल किसको दू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यात शशी कपुर सोबत नृत्यनिपूण रागिणी नायिका म्हणून होती. रफीच्या आवाजातील

‘फिर आने लगा याद मूझे प्यार का आलम
इकरार का आलम तो कभी इन्कार का आलम’

हे गाणं चांगलंच गाजलं. या गाण्यात गायिका म्हणून रफी सोबत संगीतकार उषा खन्नाचा आवाज इक्बाल कुरैशी ने वापरला आहे. अर्थात उषा खन्नाला फक्त काही शब्दच आहेत. रफी-आशा च्या द्वंद्व स्वरातील ‘तेरा नाम मेरा नाम’ हे गाणं पण बर्‍यापैकी आहे. पण यावर शंकर जयकिशनच्या संगीताचा प्रभाव खुप जाणवतो. विशेषत: भरपूर व्हायोलीन्सचा वापर शंकर जयकिशनच्याच प्रमाणे करण्यात आला आहे.

सचिन देव बर्मनचे संगीत, रफीचा आवाज, शकिलचे शब्द असा सगळा सुवर्ण योग शशी साठी पहिल्यांदाच ‘बेनझीर’ (1964) मध्ये जूळून आला. पण इतकं सगळं होवूनही यातील गाण्यांची भट्टी जमलीच नाही.  त्यातल्या त्यात ‘दिल मे एक जाने तमन्ना ने जगा पायी है, आज गुलशन मे नही दिल मे बहार आयी है’ हे गाणं बर्‍यापैकी आहे. चित्रपटात अशोक कुमार-मीना कुमारी असे दिग्गज होते. त्यामुळे अपयश त्यांच्या खात्यावर जमा झाले इतकेच.

पण पुढच्याच वर्षी एक नव्हे दोन नव्हे तर तीन तीन चित्रपट शशी कपुरचे चर्चेत राहिले. पहिला चित्रपट गाजला तो म्हणजे ‘वक्त’ (1965). पण वक्त मध्ये बलराज साहनी, सुनील दत्त, राजकुमार, साधना सारखे तगडे कलाकार होते. पण या गर्दितूनही शर्मिला-शशी च्या वाट्याला एक गोड गाणं आलं. बोटीवर तरूण तरूणींची सहल निघालेली आहे. त्या प्रसंगी महेेंद्र-आशाच्या आवाजात

दिन है बहार के तेरे मेरे इकरार के
दिल के सहारे आजा प्यार करे
दुष्मन है प्यार के जब लाखो गम संसार के
दिल के सहारे कैसे प्यार करे

हे गाणं पडद्यावर साकार झालं. तेंव्हा शर्मिला-शशी कॉलेज तरूणांच्या गळ्यातले ताईत बनले होते. दिलीप-देव-राज यांचा उतरता काळ आणि राजेश खन्नाचा अजून न आलेला जमाना या संधीकाळातील हा चित्रपट आहे. ही मधली पोकळी शशी कपुर ने भरून काढली.

खय्याम च्या संगीताने नटलेला ‘मोहब्बत इसको केहते है’ याच वर्षी आला. रफी-सुमनच्या आवाजातील ‘ठररिये होश मे आ लू , तो चले जाईगेगा’ हे रसाळ गाणं आजही ऐकावं वाटतं. शशी कपुर-नंदा या जोडीचा राज-नर्गिस, देवआनंद-नुतन, दिलीपकुमार-वैजयंतीमाला, राजेंद्रकुमार-साधना यांच्यासारखा विचार झाला पाहिजे.

1965 ला ‘जब जब फुल खिले है’ पडद्यावर आला आणि बघता बघता त्यानं बॉक्स ऑफिसवर धुम केली. हा पहिलाच चित्रपट आहे की ज्यानं शशी कपुरच्या पदरात निखळ यश टाकलं. या यशात वाटा मागायला दुसरा कुठलाही तगडा कलाकार चित्रपटात नव्हता. या चित्रपटानं शशी कपुर सोबत अजून दोघांच्या पदरात यशाचं माप टाकलं. नायिका नंदाचा हा सर्वात गाजलेला पहिलाच चित्रपट. तसेच संगीतकार म्हणून चाचपडणार्‍या कल्याणजी आनंदजीची कारकीर्द इथपासूनच व्यवसायीक दृष्टीने वेगवान झाली. (याच वर्षी कल्याणजी आनंदजीचा ‘हिमालय की गोद मे’ हा पण बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता.)

‘जब जब फुल खिले’इतकी गाणी परत शशी कपुरला ‘शर्मिली’चा अपवाद वगळता कुठल्याच चित्रपटात मिळाली नाहीत. रफी-सुमनच्या आवाजातील ‘ना ना करते प्यार तूम्हीसे कर बैठे’ या गाण्याला बीनाका गीतमालात स्थान भेटलं. याच चित्रपटात रफी आणि लताच्या आवाजात स्वतंत्रपणे ‘परदेसीयों से ना आखिया मिलाना’ हे गाणं आहे. पण यातील रफीच्या आवाजातील गाणंच जास्त गाजलं. बिनाकात त्या वर्षी हीट गाण्यांत हे पण होतं. पण लताच्या आवाजातील गाणं मात्र नव्हतं. ‘दो पेहलू दो रंग’ अशी जी गाणी आहेत त्यात पुरूष गायकांनी गायलेली गाणी जास्त गाजली पण त्या तूलनेत लताच्या आवाजातील गाणी मात्र गाजली नाहीत.
शशी कपुरच्या ‘बिरादरी’ (1966) मध्ये रफीच्या तोंडी एक अतिशय गोड गाणं चित्रगुप्तनं संगीतबद्ध केलं आहे.

अभी ना फेरो नजर जिंदगी सवार तो ले
के दिल के शीशे मे हम आपको उतार तो ले

यात  नायिका फरियाल पेक्षा शशी कपुरच जास्त देखणा दिसतो. विलक्षण हलता निरागस देखणा चेहरा, गालावरची खळी, एक थोडा पडका दात हे सगळे प्लस पॉईंट होते शशी कपुर साठी. याच चित्रपटात होळीचे एक भन्नाट गाणे चित्रगुप्त ने दिले आहे. रफी-सुमन-मन्ना डे यांच्या आवाजात हे गाणं आहे. शशी कपुर-मेहमुद-फरियाल यांनी धमाल केली आहे पडद्यावर.

आ रा रा रंग दो सभी को इस रंग मे
आयी है रंगीली होली रे

या गाण्यापासून होळीची धिंगाणा असलेली गाणी पडद्यावर सुरू झाली. यापूर्वी ‘खेलो रंग हमारे संग’ सारखी शांत गाणी होळीची असायची होती.

या सोबतच शशी कपुरचा ‘नींद हमारी ख्वाब तूम्हारे’ (1966) हा नंदासोबतचा चित्रपट पडद्यावर आला. या चित्रपटाला मदनमोहनचे संगीत होते. रफीचा आवाज आता शशी कपुरसाठी रूजू लागला होता. यातही ‘यु रूठो ना हसिना’ हे गाणं रफीच्याच आवाजात आहे. पण यातलं दुसरं गाणं विशेष गाजलं. आशा-रफीचे हे गाणे होते ‘कभी तेरा दामन ना छोडेंगे हम’.

याच वर्षी शशी कपुर-राज़श्रीचा चित्रपट ‘प्यार किये जा’ बॉक्स ऑफिसवर तूफान चालला. नुकतीच पदार्पपण केलेली लक्ष्मीकांत प्यारेलालची जोडी या चित्रपटाची संगीतकार होती. ‘पारसमणी’ च्या गाण्यांना यश मिळालं पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष चालला नव्हता. पुढच्या ‘दोस्ती’ने लक्ष्मी-प्यारे साठी कमाल केली. यानंतरचा त्यांचा गाजलेला चित्रपट म्हणजे ‘प्यार किये जा’. महेंद्र कपुर-लता च्या आजावातील ‘फुल बन जाऊंगा शर्त ये है मगर’ चांगलंच होतं. पण बिनाकात गाजलं ते ‘गोरे हाथों पर ना जूल्म करो’ हे तूलनेनं सामान्य गाणं.

पुढे हळू हळू चित्रपट गीतांचा दर्जाच घसरायला लागला. संगीतासाठी विशेष लक्षात रहावा असा ‘शर्मिली’ (1971) हा सचिन देव बर्मनच्या शेवटच्या काळातला चित्रपट शशी कपुरला मिळाला. ‘शर्मिली’ हा त्याचा गाण्यासाठीचा शेवटचा अभिजात चित्रपट. मुकेश-रफी-तलत-महेंद्र हे आवाज शशी कपुरसाठी वापरून झाले होते. पण यात किशोर कुमारचा आवाज शशी कपुरसाठी सचिनदांनी वापरला. यातली सगळीच गाणी गाजली. चित्रपटही हिट ठरला. ‘खिलते है गुल यहा’, ‘ओ मेरी ओ मेरी ओ मेरी शर्मिली’, ‘आज मदहोश हुआ जाये रे’ किंवा ‘कैसे कहे हम प्यार ने हमको क्या क्या खेल दिखाये’ सगळीची गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत.

खरं तर मधल्या काळात इतरही चित्रपटातील त्याची गाणी गाजत होतीच.

1. राजश्री सोबत ‘दिल ने पुकारा’ (1967)- वक्त करता जो वफा
2. शर्मिला सोबत ‘आमने सामने’ (1967)-कभी रात दिन हम दूर थे
3. बबिता सोबत ‘हसिना मान जायेगी’ (1969)- बेखुदी मे सनम,
4. आशा पारेख सोबत ‘कन्यादान’ (1969)- लिखे जो खत तूझे, 
5. हेमा मालिनी सोबत ‘अभिनेत्री’ (1970)- गा रे मेरे संग मेरे साजना,
पण यांच्यातून अभिजातता हरवून गेलेली होती.

इथून पुढे सुरू होतो तो संगीतासाठी रूक्ष असा ‘दिवार’ कालखंड. शशी कपुरचा सहाय्यक अभिनेता म्हणूनचा काळ. म्हणजे दिलीप-देव-राज यांचा अस्त आणि राजेश खन्ना-अमिताभ बच्चन यांचा उदय या मधल्या काळात मैदानावर येवून बॅटिंग करण्याची नाईट वॉचमनची भूमिका त्याच्या नशिबी आली होती. ती त्याने मन:पूर्वक निभावली. थोडीशी गाणी त्याच्या वाट्याला आली. त्यातून समोर उलगडत जाते ती त्याची तरूण प्रेमिकाची भूमिका.   

     -आफताब परभनवी.