Friday 25 October 2019

१० नंबरी नायकांची १०० नंबरी गाणी


मोहनगरी दिवाळी 2019

दिलीप-देव-राज हे हुकूमाचे तीन एक्के हिंदी सिनेमावर राज्य करत होते तो म्हणजे 1950 ते 1970 चा कालखंड. या काळात 1952 ला एक चित्रपट आला ज्यात यांपैकी कुणीही नव्हते. हा चित्रपट राज कपुर-देव आनंद यांच्यासारख्या बड्या निर्मात्यानेही तयार केला नव्हता. ‘प्रकाश पिक्चर्स’ या बर्‍यापैकी पण आता बुडित निघालेल्या संस्थेने हा चित्रपट काढला होता. इसाक मुजावर यांनी आपल्या पुस्तकात याबाबत एक किस्सा नोंदवला आहे (‘चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ 1931-1960’, प्रकाशक- प्रतीक प्रकाशन, पुणे.). निर्माते शंकरभाई व विजय भट्ट एक कुलूप घेवून संगीतकार नौशाद यांच्याकडे गेले. ते नौशाद यांना असे म्हणाले, ‘आमची प्रकाश पिक्चर्स चालावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचा भाव आमच्यावर न लादता कमी पैशात आमच्या ‘बैजू बावरा’ या चित्रपटाची संगीताची जबाबदारी स्वीकारा अन्यथा हे कुलूप तुमच्या हातानेच प्रकाश पिक्चर्सला लावून संस्था कायमची बंद करून टाका.’

पुढे काय आणि कसा इतिहास घडला हे रसिकांना चांगलेच माहित आहे. ‘बैजू बावरा’ ने मीनाकुमारी सारख्या नायिकेची कारकीर्द घडवली, नौशाद तर आधीच टॉपला होते पण या संगीताने त्यांच्या कारकीर्दीला चारचांद लावले. हा इतका ‘हिट’ चित्रपट देवूनही तसेच पुढेही भरपूर सांगितीक हिट चित्रपट देवूनही भारत भुषण यांच्या वाट्याला समीक्षकांचे कौतुक मात्र आले नाही. त्यांची गणना ‘अ’ दर्जाच्या अभिनेत्यांमध्ये कधी कुणी केली नाही. 

दिलीप-देव-राज यांच्या झंझावातात भारतभुषणच्या चित्रपटाची गाणी नुसती टिकलीच नाही तर अजूनही ती रसिकांच्या ओठांवर आहेत, बिनाकात तेंव्हा ही गाणी तुफान गाजली, आजही जून्या गाण्यांमध्ये ही गाणी जास्त ऐकली जातात. 

ज्या दहा नायकांनी दिलीप-देव-राज यांनी गाजवलेल्या काळातही आपल्या गाण्यांनी रसिकांच्या मनात घर केले त्यातील पहिले नाव म्हणजे भारत भुषण. या शिवाय मग प्रदीप कुमार, किशोर कुमार (नायक म्हणून), गुरूदत्त, जॉनी वॉकर, राजेंद्रकुमार, शम्मी कपुर, सुनील दत्त, धर्मेंद्र  आणि मनोजकुमार ही नावं घ्यावी लागतात.

पहिला टप्पा 1951-1956 (भारतभुषण, प्रदीपकुमार, किशोरकुमार, गुरूदत्त, जॉनी वॉकर) 

1950 नंतर चित्रपट संगीतकारांना स्टार व्हॅल्यु प्राप्त व्हायला सुरवात झाली होती.‘बैजू बावरा’चेच उदाहरण घ्यायचे  तर आपली किंमत कमी करूनही तेंव्हा नौशाद यांनी 50 हजार इतके मानधन घेतले होते. तर भरत भुषणला केवळ सहा हजार मिळाले होते. 

‘बैजू बावरा’च्या यशानं रतभुषणला सांगितिक चित्रपट पुढे सतत मिळत गेले. ‘बैजू बावरा’त  त्याच्यासाठी रफीनी गायलेली गाणी ‘मन तडपत हरी दर्शन को आज’, ‘ओ दुनिया के रखवाले’, ‘तू गंगा की मौज मै जमूना का धारा’ (लतासोबत), ‘झुले मे पवन की’ (लता सोबत) रसिकांनी प्रचंड डोक्यावर घेतली. सांगितीक हिट चित्रपटांची यादी कधीही केली तरी त्यात बैजू बावराचे नाव घेतले जाणारच. 

याच्या पुढच्याच वर्षी आलेला असाच सांगितीक हिट चित्रपट ज्यात दिलीप-देव-राज हे कुणीच नव्हते शिवाय यांच्याशी जोडला गेलेला संगीतकारही नव्हता. ‘बैजू बावरा’चे नौशादही दिलीप कुमारशी जोडल्या गेलेले होतेच. पण 1953 ला सी.रामचंद्र यांच्या ‘अनारकली’ ने सगळीकडे धूम केली. तेंव्हा त्याचा नायक प्रदीप कुमार अगदीच नवखा होता. त्याचा ‘आनंदमठ’ आधी येवून गेला होता. पण त्याला स्टार व्हॅल्यू प्राप्त झाली नव्हती. पुढेही भारतभुषण सारखीच त्यालाही तशा अर्थाने स्टार व्हॅल्यू कधीच प्राप्त झाली नाही. 

बिनाका गीतमाला नुकतीच सुरू झाली होती. आणि पहिल्याच वर्षी अनारकलीचे ‘ये जिंदगी उसी की है’ पहिल्या ‘पायदान’ वर आले. भारतभुषण सारखेच प्रदीपकुमारवरही सांगितीक चित्रपटाचा शिक्का बसला आणि त्याला पुढेही तसेच चित्रपट मिळत गेले. भारतभुषण सारखेच त्यालाही समीक्षकांनी कधी अव्वल अभिनेता मानले नाही. या दोघांवरही ‘ठोकळा’ म्हणूनच शिक्का बसला. ‘अनारकली’ गाजला पण त्यात प्रदीपकुमारच्या वाट्याला ‘जिंदगी प्यार की दो चार घडी होती है’ व ‘जाग दर्द इश्क जाग’(लता सोबत) ही हेमंतकुमारच्या आवाजातील दोनच गाणी होती. 

भारतभुषण आणि प्रदीपकुमार यांच्या शिवाय याच काळात अजून एक नायक समोर आला ज्याची गाणी रसिकांनी उचलून धरली. व्यावसायिक यश मिळालेला त्याचा पहिला चित्रपट होता ‘लडकी’. गायक म्हणून गाजलेल्या हा नायक म्हणजे किशोरकुमार. खरं तर ‘लडकी’चा नायक भारतभुषण होता. पण त्याला कुठले गाणे यात नव्हते. किशोर कुमारलाही अवघे एकच गाणे यात मिळाले होते, ‘शादी, किस्मत की बात है’. किशोरच्या या मस्तीखोर गाण्याने त्याची तीच प्रतिमा बनत गेली. पुढे त्याला भूमिकाही तशाच मिळत गेल्या आणि केवळ गाणी मिळाली तेंव्हाही बहुतांश ती तशीच मिळत गेली. 

या तिघांशिवाय ज्याच्या गाण्यांनी प्रभाव गाजवला असा चौथा नायक म्हणजे गुरूदत्त. गुरूदत्तचे सिनेमे अतिशय कमी आणि तशीच गाणीही फारशी नाहीत. पण या काळावर अभिनयासोबतच एक सांगितीक ठसा त्यानं उमटवला हे मान्यच करावं लागेल. संगीत दिग्दर्शनाचा विचार केला तरी एस.डी.बर्मन, ओ.पी.नय्यर, सी.रामचंद्र या अगदी स्टार संगीतकारांसोबतच मुकूल रॉय, रवी, हेमंतकुमार यांच्यासोबतही त्याने चित्रपट केले. आणि त्यातील गाणीही लोकप्रिय झाली.  गुरूदत्त स्वत: दिग्दर्शक, निर्माता पण त्याने सुरवातीला देवआनंदला संधी दिली. देवआनंदने ‘बाजी’ मधून त्या संधीचे सोने करून दाखवले. ‘बाजी’चे संगीतही गाजले. पुढचा गुरूदत्त प्रॉडक्शनचा चित्रपट होता ‘बाज’. यात गुरूदत्तने स्वत:च काम केले. पण हा चित्रपटही चालला नाही आणि संगीताचीही फारशी दखल घेतल्या गेली नाही. 

1954 ला आलेल्या ‘आरपार’ने गुरूदत्तला पडद्यावरचा नायक म्हणून सूर गवसला. ओ.पी.नय्यरलाही रसिकांची नाडी अचूक गवसली. पुढे एक दोन नाही तर तब्बल 15 वर्षे ओ.पी. संगीतकार म्हणून यशाच्या शिखरावर राहिले. या ‘आरपार’ मध्ये गुरूदत्तच्या वाट्याला दोन द्वंदगीते आली आहेत. ‘सुन सुन जालिमा’ आणि ‘मोहब्बत करलो जी भरलो’. रफी-गीताच्या या गाण्यांनी गुरूदत्तची एक रोम्यांटिक प्रतिमा तयार झाली. पुढे त्याची जी एक करूण अशी प्रतिमा तयार करण्यात आली, ट्रॅजेडी म्हणजे गुरूदत्त असे जे समजण्यात येवू लागले त्यापेक्षा ही प्रतिमा वेगळी तरूणांना आकर्षित करणारी आणि रसरशीत अशी होती.

याच ‘आरपार’ मध्ये गुरूदत्त सोबतच त्याच्या चित्रपटांत सतत असणार्‍या जॉनी वॉकरचे पण एक गाणं आहे. ‘अरे ना ना तौबा’. गुरूदत्तच्या चित्रपटांत आणि नंतर एकूणच त्या काळात जॉनी वॉकरचे किमान एखादे तरी गाणे चित्रपटांत असायचेच. ही सगळीच गाणी रफीसारख्या तेंव्हाच्या मातब्बर गायकाने गायली आहेत. एखाद्या नायका इतकीच लोकप्रियता जॉनी वॉकरच्या गाण्यांना लाभली आहे. याच वर्षी देवआनंदच्या ‘टॅक्सी ड्रायव्हर’मध्ये एक गाणं केवळ जॉनी वॉकरचं नाही पण या गाण्यात तो होता आणि त्यानं आवाजही दिला होता. किशोरकुमारचं हे देवआनंदवरचे गाणे होते ‘चाहे कोई खुश हो चाहे गालिया हजार दे. ’ या गाण्यात मधून मधून जॉनी वॉकर स्वत: गायला आहे. पण ‘आरपार’ मधील ‘अरे ना ना तौबा तौबा’ हे त्याला मिळालेलं स्वतंत्र पहिलं गाणं आहे. दिलीप-देव-राज यांच्या काळात गाण्याचा विचार करताना त्यांच्या शिवायचा पाचवा नायक म्हणून जॉनी वॉकरला लक्षात घ्यावे लागेल. 

1951 ते 1956 असा हा पहिला पाच वर्षाचा कालखंड. यात भारतभुषण, प्रदीपकुमार, किशोरकुमार, गुरूदत्त आणि जॉनी वॉकर यांची गाणी चित्रपटांमधून गाजत राहिली.

‘बैजू बावरा’ नंतरचा भरतभुषणचा दूसरा महत्वाचा चित्रपट म्हणजे महाकवी गालिबच्या जिवनावरचा ‘मिर्झा गालिब’. हा चित्रपट तसा उताराला लागलेली सुरैय्या, गुणी असून व्यवसायीक यश न लाभलेला संगीतकार गुलाम मोहम्मद आणि यश मिळूनही स्टारपद न मिळालेला भारतभुषण यांचा अतिशय गाजलेला चित्रपट. ‘दिले नादान तूझे हुआ क्या है’ ही गालिबची अजरामर गझल तलत व सुरैय्याच्या आवाजात आहे. रफी सोबतच तलतचाही आवाज भारतभुषण साठी इथे वापरला आहे. याच चित्रपटातील बिनाकात गाजलेली रफीच्या आवाजातील गझल ‘है बस की हर इक’  मात्र भारतभुषणच्या तोंडी नाही. रस्त्यावर एक भिकारी ही गात चालला असे दृश्य आहे. ‘या रब वो न समझे है न समझेगे मेरी बात, दे और दिल उनको जो ना दे मुझको जुबां और’ हा गाजलेला शेर यातलाच आहे. 

1956 ला भारतभुषणचा पुढचा चित्रपट आला तो म्हणजे ‘बसंत बहार’. बिनाकात हिट ठरलेले ‘बडी देर भयी’ हे रफीच्या आवाजातील आणि मन्ना-लताच्या युगल स्वरांतले ‘नैन मिले चैन कहां’ ही दोन्ही गाणी यातलीच. शंकर जयकिशनने आपल्यावरचा पाश्चात्य सुरावटीचा ठसा मिटवून अस्सल भारतीय शास्त्रीय संगीतावरच्या रचना देवून टिकाकारांना या चित्रपटात गप्प केले होते.

‘अनारकली’ नंतर पुढचा संगीतमय चित्रपट प्रदीपकुमारच्या वाट्याला आला तो म्हणजे ‘नागीन’(1954). हेमंतकुमार एक संगीतकार म्हणून ठळकपणे समोर आले आणि ज्याची व्यावसायिक पातळीवर अव्वल म्हणून दखल घेतल्या गेली तो हाच चित्रपट. यातील गाणी तुफान गाजली. पण अर्थातच बिनाकाचे सगळे यश लताच्या तीन गाण्यांना मिळाले (मन डोले मेरा तन डोले, मेरा दिल ये पुकारे आजा, जादूगर सैय्या). ते भाग्य प्रदीपकुमारच्या गाण्यांना लाभले नाही. पण प्रदीपकुमारच्या वाट्याला आलेली हेमंतकुमारच्या आवाजातील ‘ओ जिंदगी के देनेवाले’,  ‘तेरे द्वार खडा एक जोगी’, ‘अरी छोड रे पतंग’ (लता सोबत), ‘हसिनों मुझसे मत पुछो’ (आशा सोबत) ही गाणी अवीट गोडीची आहेत. 

‘नागीन’ पाठोपाठ 1956 मध्ये प्रदीपकुमारचा मधुबाला सोबतचा ‘राजहठ’ पडद्यावर आला. यातही त्याच्या वाट्याला मुकेशच्या आवाजातील ‘ये वादा करो चांद के सामने’ (लता सोबत) आणि रफीचे नितांत सुंदर ‘आऐ बहार बनके लुभाके चले गये’ ही दोन गाणी आली होती. 

किशोरकुमारचा ‘अधिकार’ 1954 ला चांगले व्यवसायीक यश मिळवून गेला. गीतासोबतचे त्याचे ‘कमाता हुं बहोत कुछ भी’ आजही लोकप्रिय आहे. ‘तिकडम बाजी’ सारखे त्याचे सोलो, मस्तीखोर गाण्यांची परंपरा सांगणारे आहे. अविनाश व्यास सारख्या दूर्लक्षीत संगीतकाराला मात्र या चित्रपटाच्या यशाचा फारसा फायदा झाला नाही. 

शंकर जयकिशनच्या संगीतात किशोर कुमार फारसा नाही. पण 1956 ला आलेल्या ‘न्यु दिल्ली’ त मात्र ही जोडी जमली आहे. ‘नखरेवाली देखने मे’ किंवा ‘अरे भाई निकलके आ घर से’ सारखी गाणी देत आपणही किशोरच्या मस्तीला सांगितीक न्याय देवू शकतो हे शंकर जयकिशनने सिद्ध केले आहे. 

गुरूदत्तचा अतिशय अप्रतिम ‘मि. ऍण्ड मिसेस 55’ 1955 ला आला. याच्या संगीतानेही कमाल केली. ओ.पी.नय्यरने ‘आरपार’ हा केवळ अपवाद नसून आपले नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केले.  रफीची एक कमाल या चित्रपटात मानावी लागेल. त्याने गुरूदत्तला आणि जॉनी वॉकरला एकाचवेळी आवाज देताना त्यातील फरकाचे जे बारकावे दिलेत त्यातून संगीतकार आणि गायक दोघांचाही कस लागतो. जॉनी वॉकर साठी ‘जाने कहां मेरा जिगर गया जी’ सारखे गाणे तर गुरूदत्त साठी त्याच गीता दत्त सोबत ‘ उधर तूम हसी हो’ सारखे सदाबहार द्वंदगीत दिले आहे. ‘उधर तूम हसी हो’ ला बिनाकातही स्थान मिळाले. यातच रफीच्या वाट्याला ‘मेरी दुनिया लुट रही थी’ आणि ‘दिल पर हुआ ऐसा जादू’ ही अजून दोन गाणी आली आहेत.

दुसरा टप्पा (1957-1961) (राजेंद्रकुमार, शम्मी कपुर, सुनील दत्त यांचे पदार्पण)
1957 साली ‘मदर इंडिया’ मुळे  पडद्यावर गाजलेले दोन अभिनेते म्हणजे राजेंद्र कुमार आणि सुनील दत्त. यांच्या सोबतच गाजलेले तिसरे नाव म्हणजे शम्मी कपुर. शम्मीचा ‘तुमसा नही देखा’ याच वर्षी गाजला. मदर इंडिया स्त्रीप्रधान असल्याने राजेंद्र कुमार, सुनील दत्त यांच्या वाट्याला फारशी गाणी नव्हती पण शम्मीच्या वाट्याला मात्र भरपुर गाणी आली. ‘सर पे टोपी लाल हात मे रेशम का रूमाल’ (रफी-आशा) आणि ‘यू तो हमने लाख हसी देखे है’ (रफी) या दोन गाण्यांनी शम्मीची जी हवा बनली ती पुढे कित्येक वर्षे टिकली. शम्मी आणि रफी हे अद्वैत निर्माण झाले. पुढे चालून संगीतकार कधी बदलले पण रफीचा आवाज हाच शम्मीचा आवाज राहिला (अपवाद ‘उजाला’ ज्यात मन्ना व मुकेशचा आवाज शम्मीसाठी आहे). खरं तर सुरवातीला शम्मीसाठी तलत/हेमंतकुमार यांचेही आवाज वापरले गेले. ही गाणी बिनाकात हीटही झाली.  जावेद अख्तरचा मामा मजाज याची सुंदर कविता  ‘ए गमे दिल क्या करू’ ही तलतच्या आवाजात आहे. सरदार मलिकने अगदी हळूवार शब्दांना न्याय देत चाल बांधली आहे (चित्रपट -ठोकर 1953). शम्मीचे दुसरे गाजलेले गाणे हेमंत कुमारच्या आवाजातील ‘हलके हलके चलो सांवरे’(संगीत- सलिल चौधरी, तांगावाली- 1955). पण हे आवाज पुढे शम्मीचा म्हणून आवाज बनले नाहीत. ओ.पी.नय्यरने ‘हम सब चोर है’ (1956) मध्ये ‘ओ मि बेंजो इशारो तो समझो’ हे गाणं रफीच्या आवाजात शम्मीला दिलं. आशा भोसले सोबत यात रफीनं अशी काही कमाल केली की हे गाणं बिनाकात तर गाजलंच पण पुढे कायमस्वरूपी रफी म्हणजे शम्मीचा आवाज हेच समीकरण रूढ झालं. 

1957 नंतर राजेंद्रकुमार, शम्मी कपुर यांचे सिनेमे सातत्याने येत राहिले. त्यातली गाणीही गाजत राहिली. आधीच्या भारतभुषणची तर कारकीर्द बहरात होतीच, फागुन (1985), रानी रूपमती (1959), बरसात की रात (1960) आणि संगीत सम्राट तानसेन (1962) अशी ओळीने उत्तम गाणी असलेली चित्रपट येतच होते.

प्रदीपकुमारच्या वाट्यालाही नंतरच्या काळात घुंघट (1960), आरती (1962), ताजमहाल (1963) या चित्रपटांत चांगली गाणी आली होती.

गुरूदत्तचा सगळ्यात गाजलेला ‘प्यासा’ (1957) आला तो याच काळात. रफीच्या आवाजातील ‘हम आपकी आंखो मे’ असो किंवा हेमंतकुमारच्या आवाजातील ‘जाने वो कैसे लोग थे जिनके’ असो आजही रसिकांच्या काळजात आढळ स्थान मिळवून आहेत. ‘प्यासा’ला सचिन देव बर्मनचा सांगितिक सुवर्णस्पर्श होता पण सोबतच साहिरची अभिजात लेखणीचेही पाठबळ होते. या चित्रपटाच्या यशामुळेच साहिर-सचिनदेव बर्मन संबंध बिघडले. 

साहिरचा कवी म्हणून इगो इतका मोठा झाला की गायक संगीतकारापेक्षा तो जास्त मानधन मागू लागला. यामुळे सुनील दत्त, राजेंद्र कुमार, धर्मेंद्र यांच्या चित्रपटांना रवी, एन.दत्ता, जयदेव यांचे संगीत आणि साहिरची गीते अशी रचना दिसून येवू लागली. हे गुणी संगीतकार होतेच पण हे मानधनासाठी निर्मात्यांना अटी घालत नव्हते. दिलीप-देव-राज यांचे मानधन न परवडणारे निर्माते या नविन नटांना आणि इतर संगीतकारांना घेवून चित्रपट करायला लागले.

जॉनी वॉकर आता गुरूदत्तच्याच नव्हे तर इतरांच्या चित्रपटांतूनही स्थिरावत चालला होता. त्याच्या वाट्याला किमान एकतरी गाणं रफीच्या आवाजात असायचेच आणि ते गाणे गाजायचेही. त्यामुळे गाण्याचा विचार करताना जॉनी वॉकरचा एक नायक म्हणून विचार करावाच लागतो. 

1960 नंतर भारतभुषण, प्रदीपकुमार मागे पडत गेले. गुरूदत्तने आत्महत्या केली. आता जमाना सुरू झाला शम्मी कपुर आणि राजेंद्रकुमारचा. 

राजेंद्रकुमारला पहिला संगीतमय चित्रपट मिळाला तो म्हणजे वसंत देसाईंचे संगीत असलेला ‘गुंज उठी शहनाई’. ‘ओ हौले हौले चलो मोरे साजना’, ‘जीवन मे पिया तेरा साथ रहे’, ‘तेरी शहनाई बोले’ सारखी एकापेक्षा एक मधुर लता-रफीची द्वंद्व गीते यात होती. राजेंद्रकुमारवर दिलीपकुमारचा प्रचंड प्रभाव होता. याच चित्रपटात बिनाकात गाजलेले करूण रसातील विरही गीत ‘केह दो कोई ना करे यहा प्यार’ याची साक्ष देते. गरिब निर्मात्यांचा दिलीपकुमार अशी एक प्रतिमा राजेंद्रकुमारची तयार झाली. सोबतच तरूणांना आकर्षित करणारा तरूण ताजा चेहरा अशीही प्रतिमा होती. कारण याच वर्षी माला सिन्हा सोबतचा ‘धुल का फुल’ही प्रदर्शित झाला. ‘तेरे प्यार का आसरा’ सारखे महेंद्र कपुर-लता च्या आवाजातील गाणेही बिनाकाच्या हिट यादीत होते. 

राजेंद्रकुमारचे चिराग कहा रोशनी कहा (1959), घराना (1961), जिंदगी और ख्वाब (1961), आस का पंछी (1961), मेरे मेहबुब (1963), दिल एक मंदिर है (1963) गेहरा दाग (1963), संगम  (1964), जिंदगी (1964), आरजू (1966) असे सलग बॉक्स ऑफिस हिट चित्रपट येत गेले. इतके सातत्य शम्मी कपुर शिवाय कुठल्याच नायकाला दाखवता आले नाही. सलग हीट गाण्यांची राजेंद्रकुमारची बरोबरी केवळ शम्मी कपुरच करू शकला. 

शम्मी कपुरच्या ‘दिल दे के देखो’ नेही याच वर्षी (1959) धमाल केली होती. ‘दिल दे के देखो’ सारखे रफीचे गाणे हिट झाले पण त्याचा वेगळाच फटका संगीतकार उषा खन्ना हीला मिळाला. इतकं चांगलं संगीत म्हणजे ओ.पी.नय्यरनेच आपल्या या भाच्चीच्या नावाने दिले असा गैरसमज पसरला. शम्मीची कारकीर्द पुढे चमकली पण उषा खन्नाला मात्र फारसे चित्रपट मिळाले नाहीत.

किशोरकुमारचा ‘चलती का नाम गाडी’ गाडी याच काळात आला होता. देवआनंद साठीच्या आपल्या मस्तीखोर गाण्याने तशीही किशोरने धूम केली होतीच. पण नायक म्हणून ‘चलती का नाम’ मधून मात्र एक वेगळीच उंची त्याच्या गाण्यांना लाभली. एक तर त्याचे हे होम प्रॉडक्शन. शिवाय मधुबाला सारखी लावण्यवती सोबत. संगीत एस.डी.बर्मन सारख्या दादा माणसाचे. ‘इक लडकी भिगी भागीसी’, ‘हाल कैसा है जनाब का’ आणि ‘बाबू समझो इशारे’ ही किशोरची तिनही गाणी बिनाकात हिट ठरली.

गुरूदत्तचे ‘चौदहवी का चांद’, ‘कागज के फुल’ या काळात येवून गेले. त्यांना फारसे व्यवसायीक यश लाभले नाही. पण दोन्हीतली गाणी मात्र गाजली. ‘चौदहवी का चांद हो’ या शीर्षक गीताने तर कमाल केली. याच चित्रपटात जॉनी वॉकर साठी ‘मेरा यार बना है दुल्हा’ रफीने गायले होते. या दोन्ही गाण्यांना बिनाकात स्थान मिळाले. शिवाय रफीच्याच आवाजातील विरह गीत ‘मिली खांक मे मुहोब्बत’ हेही बिनाकात होतं.

तिसरा टप्पा (1961-1970) (धर्मेंद्र, मनोज कुमार यांचे पदार्पण)

एव्हाना राजेंद्र कुमार व शम्मी कपुर यांची कारकीर्द स्थीर होत चालली होती. शम्मी कपुरचे सलग जंगली (1961), प्रोफेसर (1962), दिल तेरा दिवाना (1962), चायना टाऊन (1962), राजकुमार (1964), कश्मीर की कली (1964), जानवर (1965) आणि तिसरी मंझील (1966) असे एकापेक्षा एक बॉक्स ऑफिसवर यशस्वी चित्रपट येत होते.

सुनील दत्तची कारकीर्दही या काळात स्थिरावलेली दिसून येते. त्याच्या चित्रपटांतील गाण्यांना एक विशिष्ट दिशा सापडली होती. रवी चे संगीत, महेंद्र कपुरचा आवाज असा एक तो कालखंड होता. गुमराह (1963), मुझे जीने दो (1963), वक्त (1965), खानदान (1965), मेरा साया (1966), हमराज (1967). 

या काळातच दोन नायकांचे पदार्पण या काळात झाले. ‘शोला और शबनम’ (1961) मध्ये धर्मेंद्र आणि ‘हरियाली और रास्ता’ (1962) मध्ये मनोजकुमार यांना पहिल्यांदा व्यवसायीक यश अनुभवाला मिळालं.

धर्मेंद्र ची पुढे हीमॅन म्हणून जी इमेज तयार झाली त्याच्या अगदी विरोधी अशी ही सुरवातीच्या काळातील इमेज आहे. या त्याच्या चित्रपटांतील प्रेमगीतांना तेंव्हा रसिकांनी चांगली पसंतीही दिली होती. पण पुढे  चित्रपटांतून संगीतच हद्दपार व्हायला लागले शिवाय धर्मेंद्र मधला पंजाबी मल्ल उफाळून वर आला. परिणामी मारधाड वाढून अवीट गोडीची गाणी त्याच्या चित्रपटांतून कमी होत गेली. या काळात अनपढ (1962), बंदिनी (1963), आयी मिलन की बेला (1964), हकिकत (19964), काजल (1965), फुल और पत्थर (1966), आये दिन बहार के (1966), आंखे (1968), शिकार (1968), जीने की राह (1969), आया सावन झुम के (1969), यकिन (1969) असे त्याचे यशस्वी चित्रपट येत गेले. यातली गाणीही चांगली होती. पण 1966 नंतर गाण्यांचा दर्जाच घसरत गेला. 

मनोजकुमारची ‘शहिद’ पासूनच  ‘मि. भारतकुमार’ ही प्रतिमा झाली होती.  सोबतच या काळात काही चांगले प्रेम गीतांचे संगीतमय चित्रपट आले. ज्याप्रमाणे सुनील दत्त-संगीतकार रवी-गायक महेंद्र कपुर असे एक सुत्र आढळते तसेच मनोज कुमार-संगीतकार कल्याणजी आनंदजी-मुकेश असेही एक सुत्र या काळात आढळते. राज कपुर नंतर मुकेशचा आवाज अगदी ज्याची ओळख म्हणून वापरला गेला असा अभिनेता म्हणजे मनोजकुमारच. ‘हरियाली और रास्ता’ (1962) मधून त्याची गाणी पहिल्यांदा गाजली. ‘बोल तेरे तकदीर मे क्या है’ आणि ‘इब्तेदा ए इश्क मे हम’ ही दोन्ही लता-मुकेशची युगल गीतं भरपुर गाजली. बिनाकाने त्यांच्यावर शिक्कामोर्तबही केलं. अर्थात  या चित्रपटाच्या यशात नायक नायिका यांच्यापेक्षा संगीतकार शंकर जयकिशनच्या प्रतिमेचा एक मोठा वाटा होता. एव्हाना शंकर जयकिशन एक स्टार संगीतकार म्हणून शिखरावर पोचले होते.

मनोज कुमारचे ‘हरियाली और रास्ता’ नंतर पुढे ‘वो कौन थी’ (1964), हिमालय की गोद मे (1965), गुमनाम (1965), दो बदन (1966), सावन की घटा (1966), पत्थर के सनम (1967), नीलकमल (1968), आदमी (1968) असे चित्रपट येत गेले. यांना चांगले व्यावसायीक यशही मिळाले. पुढे  पुरब और पश्चिम (1970) पासून त्याची ‘मि. भारतकुमार’ ही प्रतिमा ठळक  बनली.

भारतभुषण, प्रदीपकुमार, किशोरकुमार, गुरूदत्त, राजेंद्रकुमार, शम्मी कपुर, सुनील दत्त, मनोजकुमार आणि धर्मेंद्र यांची नायक म्हणून एक कारकीर्द सगळ्यांच्या समोर आहे. त्यांची गाणीही गाजली. पण जॉनी वॉकर मात्र असा एकमेव नट आहे की जो कधीच चित्रपटाचा मुख्य नायक नव्हता पण तरीही त्याची गाणी गाजली. काही प्रमाणात असं यश मेहमुदलाही लाभलं. पण तरी त्यात जॉनी वॉकर इतकं सातत्य नाही. जॉनी वॉकरचं पहिलं गाणं ‘आरपार’ मधलं आहे ‘अरे ना ना ना तौबा तौबा’, पुढे ‘जाने कहा मेरा जिगर गया जी’ (मि. ऍण्ड मिसेस 55), ‘ए दिल है मुश्किल’ (सी.आय.डी.), ‘सर जो तेरा चकराये’(प्यासा’), ‘ऑल लाईन क्लिअर’ (चोरी चोरी), ‘जंगल मे मोर नाचा’ (मधुमती) अशी एक मालिकाच सुरू होते. केवळ ओ.पी.नय्यर सारख्या एखाद्याच संगीतकारापुरतीच ही गोष्ट मर्यादीत नव्हती. एस.डि. बर्मन, सी. रामचंद्र, सलिल चौधरी, शंकर जयकिशन, रवी, मदन मोहन, दत्तराम वाडकर, एन. दत्ता, रोशन अशा जवळपास सगळ्याच महत्वाच्या संगीतकारांनी त्याच्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण गाणी चित्रपटांत रचली.

याच काळातील विश्वजीत आणि जॉय मुखर्जी यांचीही दखल घ्यायला हवी. पण त्यांचे चित्रपट फार संख्येने आले नाहीत. शिवाय त्यांना मनोजकुमार आणि धर्मेंद्र यांच्या प्रमाणे व्यवसायीक यश मिळालेही नाही.
दिलीप-देव-राज यांच्या काळातच तीन टप्प्यांतून दहा नायक पुढे आले. त्यांची गाणी या महानायकांची गाणी गाजत असतानाच लोकांनी डोक्यावर घेतली. या काळात सी.रामचंद्र, नौशाद, शंकर जयकिशन, सचिन देव बर्मन, ओ.पी.नय्यर यांच्यासारखी संगीतकारांमधील स्टारपदाला पोचलेली माणसे गाजत होती. स्टार नसलेल्या नायकांचे चित्रपट गाजविण्यात या स्टार संगीतकारांचा वाटा मोठा आहे. 

पण या काळातच इतरही संगीतकार जे की गुणी होते पण त्यांना व्यवसायीक दृष्ट्या स्टारपद नाही मिळालं. त्यांचीही गाणी गाजत होती. त्यात मदनमोहन, रवी, हेमंतकुमार, जयदेव, खय्याम, रोशन, वसंत देसाई, उषा खन्ना, एस.एन.त्रिपाठी, चित्रगुप्त, सलिल चौधरी, गुलाम मोहम्मद यांचाही उल्लेख करावा लागेल. 

मनोजकुमार, धर्मेंद्र यांच्या कारकीर्दीला सुरवातीच्या काळात कल्याणजी आनंदजी आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासारख्या नव्या दमाच्या संगीतकारांनी आपल्या गाण्यांनी तारले.

शंकर जयकिशनसोबत शम्मी कपुर ची गाणी तुफान गाजत असतानाच्या काळातच त्याचा आर.डी. बर्मननी संगीतबद्ध केलेला ‘तिसरी मंझील’ आला आणि हिंदी संगीताची दिशाच बदलली. या सोबतच ‘बहारोंके सपने’ मधून राजेश खन्ना पुढे आला होता. पुढे ‘आराधना’ मधून त्याच्या स्टारपदावर शिक्कामोर्तब झाले. राजेश खन्ना सोबत मनोज कुमार आणि धर्मेंद्र शिवाय जून्यापैकी कुणीच टिकू शकले नाही.  ‘अंदाज’ (1971) मध्ये ‘जिंदगी एक सफर है सुहाना’ म्हणत मोटार सायकल वर हेमा मालीनीसोबत राजेश खन्नाने  धुम केली होती. त्यात शम्मी कपुर होता पण भाव खावून गेला राजेश खन्ना. यातच सगळं काही आलं.

(दहा नायकांच्या चित्रपटांतील काही महत्त्वाची दखलपात्र गाणी खाली दिली आहेत. ही यादी तयार करताना प्रामुख्याने व्यावसायीक गाजलेल्या चित्रपटांतील गाणी आणि बिनाकाच्या यादीतील सरताज गाणी यांचाच विचार केला आहे. संख्येने जास्त गाणी आढळली तिथे अपरिहार्यपणे इतर गाणी अवीट गोडीची असूनही वगळली आहेत. शम्मी कपुर आणि राजेंद्रकुमार यांची गाणी इतक्या मोठ्या संख्येने बिनाका सरताज गीते बनली आहेत की त्याशिवायची गाणी संख्येच्या मर्यादेमुळे देता आली नाहीत. * केलेली गाणी बिनाका सरताज गीते आहेत.)

भारतभुषण
1. मन तडपत हरी दर्शन को-रफी-शकिल-नौशाद-बैजू बावरा (1952)
2. ओ दुनिया के रखवाले-रफी-शकिल-नौशाद-बैजू बावरा
3. तू गंगा मी मौज मै-रफी/लता-शकिल-नौशाद-बैजू बावरा
4. झूले मे पवन की-रफी/लता-शकिल-नौशाद-बैजू बावरा
5. दिले नादान तुझे हुआ क्या है-सुरैय्या/तलत-गालिब-गुलाम मोहम्मद-मिर्झा गालिब (1954)
6.*बडी देर भयी-रफी-शैलेंद्र-शंकर जयकिशन-बसंत बहार (1956)
7. सूर ना सजे-मन्ना-शैलेंद्र-शंकर जयकिशन- बसंत बहार
8.*नैन मिले चैन कहा-मन्ना/लता-शैलेंद्र-शंकर जयकिशन-बसंत बहार
9. दो घडी वो पास आ बैठे-रफी/आशा-राजेंद्रकृष्ण-मदनमोहन- गेट वे ऑफ इंडिया (1957)
10.*एक परदेसी मेरा दिल ले गया-रफी/आशा-कमर जलालाबादी-ओ.पी.नय्यर-फागुन (1958)
11.*आ लौट के आजा मेरे मीत-मुकेश/लता-भरत व्यास-एस.एन.त्रिपाठी-रानी रूपमती (1959)
12.*जिंदगीभर नही भूलेगी-रफी/लता-साहिर-रोशन-बरसात की रात (1960)
13. झुमती चली हवा-मुकेश-शैलेंद्र-एस.एन.त्रिपाठी-संगीत सम्राट तानसेन (1962)
14.*दिल की तमन्ना थी मस्ती-रफी/आशा-मजरूह-एन.दत्ता-ग्यारा हजार लडकिया (1962)

प्रदीप कुमार
1. वंदे मातरम-हेमंत-बकिंमचंद्र-हेमंतकुमार-आनंदमठ (1951)
2. जिंदगी प्यार की दो चार-हेमंत-राजेंद्रकृष्ण-सी.रामचंद्र-अनारकली (1953)
3. तेरे द्वार खडा एक जोगी-हेमंत-राजेंद्रकृष्ण- हेमंतकुमार-नागिन (1954)
4. अरी छोड रे पतंग-हेमंत/लता-राजेंद्रकृष्ण- हेमंतकुमार-नागिन (1954)
5. ये वादा करो चांद के सामने-मुकेश/लता- शैलेंद्र-शंकर जयकिशन-राजहठ (1956)
6.*अब क्या मिसाल दू-रफी-मजरूह-रोशन-आरती (1962)
7.*आपने याद दिलाया-रफी/लता-मजरूह-रोशन-आरती
8.*जो वादा किया वो-रफी/लता-साहिर-रोशन-ताजमहाल (1963)
9.*पांव छू लेने दो-रफी/लता-साहिर-रोशन-ताजमहाल
10.*गया अंधेरा हुआ उजारा-तलत-नूर लखनवी-सी.रामचंद्र-सुबह का तारा (1954)
11.*आजा जरा मेरे-हेमंत/गीता-एस.एच.बिहारी-हेमंतकुमार-एक झलक (1957)
12.*तूम चल रहे हो-मुकेश/लता-राजेंद्रकृष्ण-मदनमोहन-दुनिया ना माने (1959)
13.*लागी मनवा के बीच कटारी-मन्ना-साहिर-रोशन-चित्रलेखा
14.*जिस दिल मे बसा था मुकेश-इंदिवर-क.आनंदजी-सहेली (1965)
15.*हम इंतजार करेंगे कयामत तक-रफी/लता-साहिर-रोशन-बहुबेगम (1967)

किशोर कुमार
1. शादी, किस्मत की बात है-किशोर-राजेंद्रकृष्ण-सुदर्शन धानीराम-लडकी (1953)
2. कमाता हु बहोत कुछ-किशोर/गीता-राजा मे. अली-अविनाश व्यास-अधिकार (1954)
3. तिकडम बाजी-किशोर-नीलकंठ तिवारी-अविनाश व्यास-अधिकार
4. नखरेवाली देखने मे-किशोर-शैलेंद्र-शंकर जयकिशन-न्यू दिल्ली (1956)
5.*दिल दिल से मिलाकर देखो-किशोर-राजेंद्रकृष्ण-मदनमोहन-मेमसाहिब (1956)
6.*मुन्ना बडा प्यारा-किशोर-शैलेंद्र-सलिल चौधरी-मुसाफिर (1957)
7.*इना मिना डिका-किशोर-राजेंद्रकृष्ण-सी.रामचंद्र-आशा (1957)
8.*इक लडकी भिगी भागीसी-किशोर-मजरूह-एस.डि.बर्मन-चलती का नाम गाडी (1958)
9.*हाल कैसा है जनाब का-किशोर/आशा-मजरूह-एस.डि.बर्मन-चलती का नाम गाडी
10.*बाबू समझो इशारे-मन्ना/किशोर-मजरूह-एस.डि.बर्मन-चलती का नाम गाडी
11.*सी ए टी कॅट-किशोर-मजरूह-रवी-दिल्ली का ठग
12.*सुरमा मेरा निराला-किशोर-मजरूह-ओ.पी.नय्यर-कभी अंधेरा कभी उजाला (1958)
13.*मै बंगाली छोकरा-किशोर/आशा-जांनिसार अख्तर-ओ.पी.नय्यर-रागिणी (1958)
14.*हम मतवाले नौजवां-किशोर-हसरत-शंकर जयकिशन-शरारत (1959)
15.*जरूरत है जरूरत है-किशोर-राजेंद्रकृष्ण-मदनमोहन-मनमौजी (1962)
16.*मचलती हुई हवा मे छम छम-किशोर/लता-मजरूह-चित्रगुप्त-गंगा की लहरे(1964)
17.*मेरे महबुब कयामत होगी-किशोर-आनंद बक्षी-लक्ष्मी प्यारे-मि.एक्स इन बॉम्बे (1964)
18.*अजनबी तुम जाने पहचाने-किशोर-असद भोपाली-लक्ष्मी प्यारे-हम सब उस्ताद है (1965)
19.*दिन जवाने के चार यार-किशोर-राजेंद्रकृष्ण-लक्ष्मी प्यार-प्यार किये जा (1966)

गुरूदत्त
1. सून सून जालिमा-गीता/रफी-मजरूह-ओ.पी.नय्यर-आरपार (1954)
2. मोहब्बत करलो जी भरला-रफी/गीता-मजरूह-ओ.पी.नय्यर-आरपार
3.*उधर तूम हसी हो-रफी/गीता-मजरूह-ओ.पी.नय्यर-मि.ऍण्ड मिसेस 55 (1955)
4. चल दिये बंदा नवाज-रफी/गीता-मजरूह-ओ.पी.नय्यर-मि.ऍण्ड मिसेस 55
5. दिल पर हुआ एैसा जादू-रफी-मजरूह-ओ.पी.नय्यर-मि.ऍण्ड मिसेस 55
6. ये महलों ये तख्तो-रफी-साहिर-एस.डि.बर्मन-प्यासा (1955)
7. जाने वो कैसे लोग थे जिनके-हेमंत-साहिर-एस.डि.बर्मन-प्यासा
8. जिन्हे नाज है हिंद पर वो-रफी-साहिर-एस.डि.बर्मन-प्यासा
9. हम आपकी आंखो मे-रफी/गीता-साहिर-एस.डि.बर्मन-प्यासा
10. तूम जो हुये मेरे हमसफर-रफी/गीता-मजरूह-ओ.पी.नय्यर-12 ओ क्लॉक (1958)
11. देखी जमाने की यारी-रफी-कैफी आझमी-एस.डि.बर्मन-कागज के फुल (1959)
12.*चौदहवी का चांद हो-रफी-शकिल-रवी-चौदहवी का चांद (1960)
13.*मिली खांक मे मुहोब्बत-रफी-शकिल-रवी-चौदहवी का चांद
14. उम्र हुई तूमसे मिले-हेमंत/लता-साहिर-सी.रामचंद्र-बहुरानी (1963)
15. आज की मुलाकात-लता/महेंद्र-राजेंद्रकृष्ण-रवी-भरोसा (1963)

जॉनी वॉकर
1. अरे ना ना तौबा-रफी/गीता-मजरूह-ओ.पी.नय्यर-आरपार (1954)
2. जाने कहा मेरा-रफी/गीता-मजरूह-ओ.पी.नय्यर-मि.ऍण्ड मिसेस 55 (1955)
3.*ए दिल है मुश्किल है-रफी/गीता-मजरूह-ओ.पी.नय्यर-सी.आय.डी. (1956)
4. ऑल लाईन क्लिअर-रफी-हसरत-शंकर जयकिशन-चोरी चोरी (1956)
5.*सर जो तेरा चकराये-रफी-साहिर-एस.डि.बर्मन-प्यासा (1957)
6.* मै बंबई का बाबू नाम मेरा-रफी-साहिर-ओ.पी.नय्यर-नया दौर (1957)
7. जंगल मे मोर नाचा-रफी-शैलेंद्र-सलिल चौधरी-मधुमती (1958)
8.*मै मै कार्टून-शम/रफी/आशा-हसरत-ओ.पी.नय्यर-मि.कार्टून एम ए (1958)
9.*बडा ही सी.आय.डी. है-रफी-राजेंद्रकृष्ण-मदनमोहन-चंदन (1958)
10. कडकी तेरा नामही कलरकी-आशा/रफी-फारूख कैसर-रोशन-अजी बस शुक्रिया (1958)
11. हम तुम जिसे केहते है शादी -रफी-कैफी आझमी-एस.डि.बर्मन-कागज के फुल (1959)
12.*मेरा यार बना है दुल्हा-रफी-शकिल-रवी-चौदहवी का चांद (1960)
13.*हम भी अगर बच्चे होते-रफी-शकिल-रवी-दूर की आवाज (1964)
14. सुनो सुनो मिस चॅटर्जी-रफी/आशा-अंजान-ओ.पी.नय्यर-बहारे फिर भी आयेगी (1966)

राजेंद्र कुमार
1.*आजा जरा मेरे-हेमंत/गीता-एस.एच.बिहारी-हेमंतकुमार-एक झलक (1957)
2.*तेरे प्यार का आसरा-लता/महेंद्र-साहिर-एन.दत्ता-धूल का फुल (1959)
3.*धडकने लगे दिल के-आशा/महेंद्र-साहिर-एन.दत्ता-धूल का फुल
4.*बिखर गये बचपन के-रफी-भरत व्यास-वसंत देसाई -गुंज उठी शहनाई
5.*मैने पिना सिख लिय-रफी-भरत व्यास-वसंत देसाई-गुंज उठी शहनाई
6.*तूम रूठी रहो मै मनाता रहू-मुकेश/लता-हसरत-शंकर जयकिशन-आस का पंछी (1961)
7.*दिल तेरा एक आस का पंछी-सुबीर सेन-हसरत-शंकर जयकिशन-आस का पंछी
8.*तेरी प्यारी प्यारी सुरत को-रफी-हसरत-शंकर जयकिशन- ससुराल (1961)
9.*इक सवाल मै करू-रफी/लता-शैलेंद्र-शंकर जयकिशन-ससुराल
10.*हुस्नवाले तेरा जवाब नही-रफी-शकिल-रवी-घराना (1961)
11.*मेरे मेहबुब तूझ-रफी-शकिल-नौशाद-मेरे मेहबुब (1963)
12.*दिल एक मंदिर है-रफी/सुमन-हसरत-शंकर जयकिशन-दिल एक मंदिर है
13.*तूम कमसिन हा-रफी-हसरत-शंकर जयकिशन-आयी मिलन की बेला (1964)
14.*प्यार आखों से जताया-रफी-हसरत-शंकर जयकिशन-आयी मिलन की बेला
15.*ये मेरा प्रेमपत्र पढकर-रफी-हसरत-शंकर जयकिशन-संगम (1964)
16.*दोस्त दोस्त ना रहा-मुकेश-शैलेंद्र-शंकर जयकिशन-संगम
17.*छलके तेरी आंखो से-रफी-हसरत-शंकर जयकिशन-आरजू (1965)
18.*बहारों फुल बरसाओ मेरा मेहबुब-रफी-हसरत-शंकर जयकिशन-सुरज (1966)

शम्मी कपुर
1.*ए गमे दिल क्या करू-तलत-मजाज-सरदार मलिक-ठोकर (1953)
2.*हलके हलके चलो सांवरे-हेमंत/लता-प्रेम धवन-सलिल चौधरी-तांगावाली (1955)
3.*ओ मि बेंजो इशारो तो रफी/आशा-मजरूह-ओ.पी.नय्यर-हम सब चोर है (1956)
4.*सर पे टोपी लाल हाथ मे-रफी/आशा-मजरूह-ओ.पी.नय्यर-तूमसा नही देखा (1957)
5.*यू तो हमने लाख हसी देखे है-रफी-साहिर-ओ.पी.नय्यर-तूमसा नही देखा
6.*दिल दे के देखो-रफी/आशा-मजरूह-उषा खन्ना-दिल दे के देखो (1959)
7.*बडे है दिल के काले-रफी/आशा-मजरूह-उषा खन्ना-दिल दे के देखो
8.*बोलो बोलो कुछ ता-रफी-मजरूह-उषा खन्ना-दिल दे के देखा
9.*झुमता मौसम मस्त नजारा-मन्ना/लता-हसरत-शंकर जयकिशन-उजाला (1960)
10.*ये शहर बडा अलबेला-मुकेश-शैलेेंद्र-शंकर जयकिशन-सिंगापोर (1960)
11.*एहसान तेरा होगा मुझपे-रफी-हसरत-शंकर जयकिशन-जंगली (1961)
12.*याहू चाहे कोई मुझे जंगली कहे-रफी-शैलेंद्र-शंकर जयकिशन-जंगली
13.*आवाज दे के-रफी/लता-हसरत-शंकर जयकिशन-प्रोफेसर (1962)
14.*ए गुलबदन-रफी-हसरत-शंकर जयकिशन-प्रोफेसर
15.*दिल तेरा दिवाना है-रफी/लता-शैलेंद्र-शंकर जयकिशन-दिल तेरा दिवाना (1962)
16.*गोविंदा आला रे आला-रफी-राजेंद्रकृष्ण-क.आनंदजी-ब्लफ मास्टर (1963)
17.*जाने बहार हुस्न तेरा बेमिसाल-रफी-शकिल-रवी-प्यार कीया तो डरना क्या (1963)
18.*ये चांद सा रोशन चेहरा-रफी-एस.एच.बिहारी-ओ.पी.नय्यर-कश्मिर की कली (1964)
19.* तुमसे अच्छा कौन ह-रफी-हसरत-शंकर जयकिशन-जानवर (1965)
20.*लाल छडी मैदान खडी-रफी-शैलेंद्र-शंकर जयकिशन-जानवर
21.*ओ हसिना जुल्फोवाली-रफी/आशा-मजरूह-आर.डि.बर्मन-तिसरी मंझिल (1966)
22.*आजा आजा मै हू प्यार तेरा-रफी/आशा-मजरूह-आर.डि.बर्मन-तिसरी मंझिल

सुनील दत्त
1. संभल ए दिल-रफी/आशा-साहिर-एन.दत्ता-साधना (1958)
2.*जलते है जिसके लिये-तलत-मजरूह-एस.डि.बर्मन-सुजाता (1959)
3.*चांदसा मुखडा क्यू शरमाया-रफी/आशा-शैलेंद्र-एस.डि.बर्मन-इन्सान जाग उठा (1959)
4.*मतवाली नार-मुकेश-शैलेंद्र-शंकर जयकिशन-एक फुल चार कांटे (1960)
5.*छोडो कल की बाते-मुकेश-प्रेम धवन-उषा खन्ना-हम हिंदुस्थानी (1960)
6.*इतना ना मुझसे तू प्यार-तलत/लता-राजेंद्रकृष्ण-सलिल चौधरी-छाया (1961)
7.*मै कौन हू मै कहा हू-रफी-राजेंद्रकृष्ण-चित्रगुप्त-मै चुप रहूंगी (1962)
8.*चलो एक बार फिरसे-महेंद्र-साहिर-रवी-गुमराह (1963)
9.*इन हवाओं मे-आशा/महेंद्र-साहिर-रवी-गुमरा
10.*ये वादिया ये फिजाये-रफी-साहिर-रवी-आज और कल (1963)
11. अब कोई गुलशन ना उजडे-रफी-साहिर-जयदेव-मुझे जिने दो (1963)
12*मैने देखा है की फुलों से लदी-आशा/महेंद्र-साहिर-रवी-वक्त (1965)
13.*ओ बडी देर भयी नंदलाला-रफी-राजेंद्रकृष्ण-रवी-खानदान (1965)
14.*नील गगन पर उडते बादल-रफी/आशा-राजेंद्रकृष्ण-रवी-खानदान
15. आप के पहलू मे आके -रफी-रा.मेहदी अली-मदनमोहन-मेरा साया (1966)

धर्मेंद्र
1.*मुझको इस रात की तनहाई -मुकेश-शमिम जयपुरी-क.आनंदजी-दिल भी तेरा हम भी तेरे (1960)
2. जीत ही लेंगे बाजी हम तूम-रफी-कैफी आझमी-खय्याम-शोला और शबनम (1961)
3.*ओ जानेवाले हो सके-मुकेश-शैलेंद्र-एस.डि.बर्मन-बंदिनी (1963)
4. कर चले हम फिदा-रफी-कैफी आझमी-मदनमोहन-हकिकत (1964)
5. येही है तमन्ना -रफी-रा.मेहदी अली-मदनमोहन-आप की परछाई (1964)
6. तूम्हे जिंदगी के उजाले-मुकेश-गुलजार-क.आनंदजी- पुर्णिमा (1965)
7. हम सफर मेरे हमसफर-मुकेश/लता-अंजान-क.आनंदजी-पुर्णिमा
8. रहे ना रहे हम -रफी/सुमन-मजरूह-रोशन-ममता (1965)
9.*ये कली जब तलक फुल-लता/महेंद्र-आनंद बक्षी-लक्ष्मी प्यारे-आये दिन बहार के (1966)
10.*मेरे दुष्मन तू मेरी दोस्ती-रफी-आनंद बक्षी-लक्ष्मी प्यारे-आये दिन बहार के
11.*बदल जाये अगर माली-महेंद्र-कैफी आझमी-ओ.पी.नय्यर-बहारे फिर भी आयेगी (1966)
12.*बहारों ने मेरा चमन-मुकेश-आनंद बक्षी-रोशन-देवर (1966)
13.*काजलवाले नैन मिलाके-रफी-आनंद बक्षी-रोशन-देवर
14.*दिल ने फिर याद किया-मुकेश/रफी/सुमन-जी.एस.रावेल-सोनिक ओमी-दिल ने फिर याद किया (1966)
15े.*कलियो ने घुंघट खोला-रफी-जी.एस.रावेल-सोनिक ओमी-दिल ने फिर याद किया

मनोजकुमार
1. जुल्फों की घटा लेकर-मन्ना/आशा-राजा मे.अली-बाबुल-रेश्मी रूमाल (1961)
2. साथ हो तूम और रात जवां-मुकेश/आशा-शैलेंद्र-सुहरीद कार-कांच की गुडिया (1961)
3. बागों मे खिलते फूल-तलत/लता-राजेंद्रकृष्ण-चित्रगुप्त-सुहाग सिंदूर (1961)
4. चांदी का गोल गोल चंदा-रफी/लता-भरत व्यास-एस.एन.त्रिपाठी-पिया मिलन की आस (1961)
4.*बोल तेरे तकदिर मे क्या-मुकेश/लता-शैलेंद्र-शंकर जयकिशन-हरियाली और रास्ता (1962)
5.*इब्तदा ए इश्क मे हम-मुकेश/लता-हसरत -शंकर जयकिशन-हरियाली और रास्ता
6. तेरी याद दिल से-मुकेश-शैलेंद्र-शंकर जयकिशन-हरियाली और रास्ता
7. लाखो तारे आसमान मे-मुकेश-शैलेंद्र-शंकर जयकिशन-हरियाली और रास्ता
8. ए दिल ए आवारा चल-मुकेश-मजरूह-एस.डि.बर्मन-डॉ. विद्या (1962)
9. छोडकर तेरे प्यार का-लता/महेंद्र-रा.मेहदी अली-मदनमोहन-वो कौन थी (1964)
10.गगन के चंदा-लता/सुबीर-शैलेंद्र-शंकर जयकिशन-अपने हुये पराये (1964)
11.*चांद सी मेहबुबा हो मेरी कब-मुकेश-आनंद बक्षी-क.आनंदजी-हिमालय की गोद मे (1965)
12. मै तो इक ख्वाब हू-मुकेश-क.जलालाबादी- क.आनंदजी-हिमालय की गोद मे
14. जाने चमन शोला बदन-रफी/शारदा-शैलेंद्र-शंकर जयकिशन-गुमनाम (1965)
15. ए वतन ए वतन-रफी-प्रेम धवन-प्रेम धवन-शहीद (1965)
16. ओ मेरा रंग दे बसंती-मुकेश/महेंद्र-प्रेम धवन-प्रेम धवन-शहीद
17. सरफरोशी की तमन्ना-मन्ना/रफी-रामप्रसाद-प्रेम धवन-शहीद
18. रहा गर्दिशो मे हर दम-रफी-शकिल-रवी-दो बदन (1966)
19. होठों पे हसी आंखो मे नशा-रफी/आशा-एस.एच.बिहारी-ओ.पी.नय्यर-सावन की घटा (1966)
20. जूल्फों को हटा ले-रफी-एस.एच.बिहारी-ओ.पी.नय्यर-सावन की घटा

No comments:

Post a Comment